
प्रतिनिधी पूणे दि. ०३ जानेवारी २०२४ पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सारथी मार्फत दरवर्षी फेलोशिप देण्यात येते. सारथी, बार्टी व महाज्योती या तीनही संस्थांना समान न्याय असावे असे शासनाचे धोरण असताना बार्टीला वेगळा न्याय व सारथीला वेगळा न्याय कशासाठी असा सवाल करत विद्यार्थी दोन दिवसांन पासून सारथी कार्यालयाबाहेर बेमुदत ठिय्या आंदोलनाला बसलेले आहेत.
बार्टीने पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी CET परिक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सारथीने सुद्धा सरसकट १३२९ विद्यार्थ्यांना फेलोशिप द्यावी अशी मागणी स्वराज्यच्या वतीने करण्यात आली.
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली संघटनेच्या पुण्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्या दालनात गोंधळ घातल्यानंतर तेथील फाईल्स व कॉम्प्युटर हलविण्यात आले. पोलीस प्रशासनाने कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.
‘शासन सारथी, बार्टी व महाज्योतीला समान न्याय देण्याची भूमिका घेते मग अधिकारी त्या निर्णयाचे पालन का करत नाहीत? जमत नसेल तर खुर्ची सोडावी अन्यथा स्वराज्य पक्ष विद्यार्थ्यांसाठी संघर्ष करायला तयार आहे.’ असे मत स्वराज्यचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी स्वराज्यचे सरचिटणीस डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष रघुनाथ चित्रे पाटील, राजू फाले, प्रतिक साखरे, विजय जरे, प्रविण भोसले, विक्रम कदम, द्वारकेश जाधव, अजित बाबळसुरे, रोहित शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





