उत्सवदेश-विदेशपिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे पिंपरीत भूमिपूजन संपन्न..

रमाईंचा त्याग आणि समर्पणच बाबासाहेबांच्या कार्यामागची खरी ताकद; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ एप्रिल २०२६ त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर या संघर्ष, त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, पण त्या विचारांना उभं राहण्यासाठी जी शांत, नि:स्वार्थ ताकद लागते, ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच पिंपरी येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे स्मारक म्हणजे केवळ एक वास्तू नसून त्याग, स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) लगतच्या मोकळ्या जागेत उभारण्यात येणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टीचे भूमिपूजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते.
भूमिपूजन सोहळ्यास आमदार महेश लांडगे, उमा खापरे, शंकर जगताप, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, माजी मंत्री विजय गिरकर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, माजी महापौर तथा नगरसदस्य योगेश बहल, डॉ. वैशाली घोडेकर, शंकुतला धराडे, नगरसदस्य सिद्धार्थ बनसोडे, सारिका मासुळकर, राहुल भोसले, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, कुशाग्र कदम, तुषार हिंगे, नगरसदस्य शत्रुघ्न काटे, राहुल कलाटे, डॉ. सुहास कांबळे, धर्मपाल तंतरपाळे, कुणाल व्हावळकर, बाबासाहेब त्रिभुवन, कुंदन गायकवाड, निलेश नेवाळे, सारिका गायकवाड, निकिता कदम, सोनम मोरे, रेश्मा भुजबळ, श्रुती वाकडकर, तृप्ती कांबळे, प्रियांका कुदळे, योगिता बारणे, अर्चना सस्ते, माजी नगरसेवक विकास डोळस, मारुती भापकर, अंकुश कानडी, माजी नगरसदस्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह पुणे महापालिकेचे उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसदस्य निलेश आल्हाट तसेच सहशहर अभियंता मनोज सेठिया, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली चळवळ ही केवळ एका घटकापुरती मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या मुक्तीसाठीची होती, असे सांगत त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. “बाबासाहेब नसते तर आम्हाला आज मुक्तपणे बोलण्याचाही अधिकार मिळाला नसता,” असे ते म्हणाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत, शाळेच्या बाहेर बसून ज्ञान मिळवणाऱ्या बाबासाहेबांनी पुढे देशाला संविधान देत समानतेचा पाया रचला, ही बाब आजच्या व भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

बाबासाहेबांच्या आयुष्यातील संघर्षमय वाटचालीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले, त्यांनी कधीही पैशाला प्राधान्य दिले नाही, तर ज्ञान, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांसाठी आयुष्य अर्पण केले. त्यांच्या या प्रवासात त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे मोलाचे योगदान होते. “अत्यंत हालअपेष्टा सहन करत माता रमाईंनी बाबासाहेबांच्या कार्याला ताकदीने साथ दिली. त्यांचा त्याग आणि समर्पण हीच खरी प्रेरणा आहे,” असेही ते म्हणाले. तसेच आज समाजात शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचे जे वातावरण निर्माण झाले आहे, ते डॉ. बाबासाहेबांच्या कार्यामुळेच शक्य झाले आहे, असे सांगत त्यांनी उपस्थितांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. “आज कोणत्याही शाळेतून आम्हाला बाहेर काढण्याची कुणाचीही हिम्मत नाही, ही आमच्या पाठीशी असलेली डॉ. बाबासाहेबांची ताकद आहे,” असे ठामपणे त्यांनी अधोरेखित केले.

पिंपरी चिंचवड येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे स्मारक देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले. “हा लढा दीर्घ होता, मात्र शेवटी त्याला यश मिळाले आहे,” असे सांगत त्यांनी स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी इच्छुक असून त्याही कार्यक्रमास मी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

तसेच शायरीच्या माध्यमातून त्यांनी ‘बाबासाहेबांकडे नव्हती पैशांची कमाई, पण त्यांच्या मागे उभी होती रमाई’
‘बाबासाहेबांमुळे आमचं वाढलंय बळ, म्हणून आमची कोणी काढत नाही कळ’
‘ माझा भीम आहे चमकता तारा, त्याचा अपमान केला तर वाजवू बारा’ अशा कविता म्हणत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले, पिंपरी येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या सृष्टीच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानास्पद बाब आहे. यानिमित्ताने रमाईंच्या कार्यावर प्रेम करणाऱ्या पिंपरीतील जनतेचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन तसेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर, आयुक्त तसेच सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य प्रभावीपणे जनतेसमोर मांडणारी भीमसृष्टी देखील पिंपरी येथे आहे. “देशभरातून जेव्हा लोक माझ्याकडे येऊन डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याविषयी मार्गदर्शन विचारतात, तेव्हा मी त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने उभारलेला पुतळा पाहण्याचा सल्ला देतो,” असे त्यांनी नमूद केले. पिंपरी येथे उभारलेल्या या स्मारकांमुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक अभिवादनासाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरात एकाच ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले तसेच आता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारक साकारले जात असून, शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांसारख्या महापुरुषांची स्मारके उभारण्यात आली आहेत. या सर्व स्मारकांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचा आणि प्रेरणेचा एक सशक्त वारसा जतन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे, असे सांगून महापुरुषांच्या विचारांचे जतन आणि प्रसार करण्यासाठी अशा प्रकारची स्मारके उभी करणे ही काळाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने या दिशेने उचललेले पाऊल हे खरोखरच अनुकरणीय आहे, असेही ते म्हणाले. 
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे म्हणाले, माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या सृष्टीसाठी कार्यकर्त्यांनी तब्बल पंधरा वर्षे सातत्याने लढा दिला असून, त्या संघर्षाला आज न्याय मिळाल्याचे समाधान आहे. या संदर्भात त्यांनी विविध स्तरांवर वारंवार पत्रव्यवहार करून विषय जिवंत ठेवला आणि अखेर त्याचे फलित भूमिपूजनाच्या रूपाने समोर आले. खरंतर हा सोहळा ११ एप्रिल रोजीच पार पाडण्याचे नियोजन होते, मात्र काही कारणास्तव तो पुढे ढकलावा लागला, असे त्यांनी स्पष्ट केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहिल्याचे नमूद करत, “तुमच्या सर्वांच्या साक्षीने हे भूमिपूजन होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले. देशात पहिल्यांदाच त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे असे भव्य स्मारक साकारले जात असून, सुमारे २७ कोटी रुपये खर्च करून महापालिकेने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
याच ठिकाणी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित स्मारकही उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले. माता रमाई यांचा जन्म कोकणातील एका साध्या खेडेगावात झाला असून, बालपणापासूनच त्यांच्या आयुष्यात संघर्ष होता; मात्र त्यांनी कष्ट करण्याची वृत्ती कधीही सोडली नाही, असे त्यांनी अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले आणि त्या महान कार्यामागे रमाईंची खंबीर साथ होती. “कदाचित रमाई नसत्या, तर बाबासाहेबांना हे कार्य इतक्या मोठ्या प्रमाणावर साध्य करणे कठीण झाले असते,” असे नमूद करत त्यांनी रमाईंच्या त्याग आणि संघर्षाचे स्मरण केले. आज त्यांच्या स्मारकाचे भूमिपूजन होत असताना आनंदासोबत अभिमानाची भावना निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शब्दांचे बादशाह आणि विचारांचे वादळ, असे रामदास आठवले साहेबांचे व्यक्तिमत्त्व प्रेमळ अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याप्रती आदरभाव व्यक्त केला.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांच्या सृष्टीच्या भूमिपूजनाचा हा क्षण केवळ पिंपरी चिंचवडसाठी नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी ऐतिहासिक आहे. हा प्रकल्प म्हणजे संघर्ष, त्याग आणि सामाजिक परिवर्तनाच्या मूल्यांना दिलेला सन्मान असून, येणाऱ्या पिढ्यांसाठी तो प्रेरणास्थान ठरणार आहे.

यावेळी माजी मंत्री विजय गिरकर, नगरसदस्या वैशाली घोडेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तसेच उपस्थितांचे आभार नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे यांनी मानले तर सुत्रसंचालन विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. याशिवाय यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वतीने सहशहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता विजय जाधव, संदीप ठोकळे, मूर्तीकार महेंद्र थोपटे, आर्किटेक्ट एस. चिद्दरवार यांचा तसेच उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांचाही सन्मान करण्यात आला.
*चौकट – लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या गीतगायनाने भारावला भीमसृष्टी परिसर*
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. त्यांच्या आवाजात सादर झालेल्या सामाजिक जाणीवा जागृत करणाऱ्या तसेच प्रेरणादायी गीतांनी उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला अभिवादन करणाऱ्या गीतांवर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात दाद दिली. या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पिंपरी चिंचवड परिसरासह शहराच्या विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!