शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा युवाशक्तीच्या संघर्षाचा विजय- सतिश काळे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ जुलै २०२६ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा दिलेला राजीनामा हा देशभरातील सीजेपी, विद्यार्थी,युवक, पालक तसेच महाराष्ट्रातील संभाजी ब्रिगेड आणि आंबेडकरवादी संघटना तसेच विविध पुरोगामी संघटनांनी उभारलेल्या तीव्र जनआंदोलनाचा मोठा विजय असल्याची भावना संभाजी ब्रिगेड पिंपरी चिंचवडचे शहर अध्यक्ष सतिश काळे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या अनागोंदीच्या विरोधात महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडसह अनेक पुरोगामी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलने, निदर्शने, निवेदने आणि जनजागृती अभियान राबवले. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा उभारल्यामुळे केंद्र सरकारवर नैतिक दबाव निर्माण झाला आणि अखेर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.
हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, युवकांच्या संघर्षाचा आणि लोकशाही मार्गाने उभारलेल्या जनआंदोलनाचा विजय आहे. या संघर्षात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी,पालक,सामाजिक कार्यकर्ते आणि पुरोगामी संघटनांचे संभाजी ब्रिगेड अभिनंदन करते.
संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे की, केवळ राजीनामा देऊन प्रश्न संपणार नाही. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच पारदर्शक, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीहिताचे शिक्षण धोरण राबविण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू असलेला हा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील. देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी, पारदर्शक परीक्षा व्यवस्था आणि न्याय मिळेपर्यंत विद्यार्थी संघटना, संभाजी ब्रिगेड व पुरोगामी संघटनांचा संघर्ष अविरत सुरू राहील असा निर्धार प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त करण्यात आला.



