महाराष्ट्रसामाजिक

महिलांना अर्ध्या तिकिटात एस.टी. प्रवास माजी लोकप्रतिनिधींनी पेढे वाटून आनंद व्यक्त करणे, महागाईत झळा सोसणाऱ्या महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार – सौ. वैशाली आभाळे

कोपरगाव प्रतिनिधी (अजय विघे) : एस. टी. च्या तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचे कोपरगावच्या माजी महिला लोकप्रतिनिधींनी पेढे वाटून व्यक्त केलेला आनंद महागाईच्या चटक्याने होरपळलेल्या सर्व सामान्य कष्टकरी, मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.

सौ. वैशाली आभाळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, एस. टी. च्या तिकिटात महिलांना ५० टक्के सवलत देण्यापेक्षा जर राज्य शासनाने घरगुती इंधनाच्या दरात ५० टक्के कपात केली असती तर निश्चितपणे सर्वच महीलांनी आनंद व्यक्त केला असता कारण त्यामुळे महागाईची झळ कुठेतरी नक्कीच कमी झाली असती. मात्र महिलांना एस.टी.च्या तिकिटात ५० टक्के सवलत मिळावी अशी महिला भगिनींची मागणी

नव्हती. याउलट पोटाला चिमटा देवून गॅस टाकी भरण्यासाठी पैसे जमविण्यासाठी महीलांची होत असलेली परवड थांबविणे खऱ्या अर्थाने गरजेचे होते. त्यासाठी गगनाला भिडलेल्या घरगुती इंधनाचे दर मोलमजुरी, रोजंदारी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्यात आण गरजेचे असल्यामुळे इंधनाच्या दरात कपात करणे गरजेचे होते. अशी राज्यातील प्रत्येक महिला भगिनीची मागणी आहे. मागील काही वर्षात घरगुती इंधनाच्या दराने नवनवे विक्रम केले असून

महिला भगिनींचे किचन बजेट कोलमडले असून अकराशे पन्नासच्यावर पैसे गॅस टाकीला मोजावे लागत आहे. त्यामुळे एवढ्या महागाईच्या काळात संसाराचा गाडा कसा हाकायचा याची चिंता प्रत्येक महिलेला पडली आहे. त्यामुळे कधीतरी वर्ष सहा महिन्यातून घराबाहेर पडणाऱ्या सर्व सामान्य कुटुंबातील महिलांना एखाद्या वेळी या एस.टी.च्या तिकिटात ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार असला तरी यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलत देण्यात आली आहे त्यामुळे यात कधी मधी एस. टी. ने प्रवास करणाऱ्या महिला भगिनींना विशेष असा फायदा होईल असे काही नाही. मात्र या ५० टक्के सवलती ऐवजी जर घरगुती इंधनाच्या दरात ५० टक्के कपात करण्याऐवजी २५ टक्के जरी कपात राज्य शासनाने केली असती तर मजुरी करून गॅस टाकी भरण्यासाठी पैसे जमविणाऱ्या तिच्या थकलेल्या चेहऱ्यावरच्या चिंता नाहीशा होवून त्या महिलेने एस. टी. च्या तिकिटाचे पूर्ण पैसे देवून आनंदाने प्रवास केला असता. त्यामुळे महिला भगिनींची मागणी नसतांना एस.टी.च्या तिकिटात ५० टक्के सवलत देण्यापेक्षा घरगुती इंधनाच्या दरात कपात करणे खऱ्या अर्थाने गरजेचे होते. त्यामुळे एस. टी. च्या तिकिटात ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयाचा आनंदोत्सव साजरा करून त्यातही माजी महिला लोकप्रतिनिधींनी आनंद साजरा करून पेढे वाटप करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न माझ्यासारख्या असंख्य महिला भगिनींना पडला असल्याचे सौ. वैशाली आभाळे यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!