“एक तरी ओवी” पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पुणे येथे आयोजित करण्यात आला..

प्रतिनीधी पुणे : श्री कृष्णा जाधव (उपजिल्हाधिकारी) द्वारा लिखित “एक तरी ओवी ” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवार दि. १३/०६/२०२३ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, बीबवेवाडी पुणे येथे सायं. ४ ते ७ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
नवं चैतन्य प्रकाशन, अंधेरी मुंबई (सौ. सुप्रिया शरद मराठे) यांनी पुस्तकाचे प्रकाशन केले. या प्रकाशन सोहळ्याचे संयोजन दैनिक राज्य लोकतंत्रने केले. तसेच प्रसार माध्यम समन्वयक दैनिक राज्य लोकतंत्रने केले आहे.
श्री ज्ञानेश्वरी मधील १ ते ०६ अध्यायातील श्री ज्ञानेश्वरांनी ओव्यांद्वारे मांडलेल्या सिद्धांतांचे सहज सोप्या भाषेत निरुपण या पुस्तकात केले आहे. ७५० वर्षापूर्वी “माउलींनी’ भागवत धर्माचा पाया रचला. वारकरी सांप्रदाय ज्ञानेश्वरी मधील तत्वांची उपासना करत सर्वसामान्यांच्या जिवनात निर्भळ भक्ती रसाच्या आनंदाचे क्षण निर्माण करत आला आहे. ही तत्वं आजच्या तरुणांच्या जीवनात अती उपयुक्त ठरणार आहेत.
विज्ञान युगातील तरुण अधिक सुज्ञ आहे. त्यांची ज्ञानग्रहणाची शक्ती अचार आणि अफाट आहे. त्यांना माउलींच्या तत्वांची ओळख करून देणे काळाची गरज आहे. झपाट्याने बदलणाऱ्या युगात आमच्या तरुणांच्या हाती हे ज्ञानभांडार देणे गरजेचे आहे. जगण्यासाठी विविध व्यवसाय, उद्योग, नोकरी करणे जसे गरजेचे आहे, तितकीच किंबहुना त्याहून अधिक गरज सुस्केत, समृद्ध आणि मूल्याधिष्ठीत जीवन जगण्यासाठी ज्ञानेश्वरी मधील तत्वांची नितांत आवश्यकता आहे. धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात माऊली तत्व ज्ञान जीवनातील नितांत सहजसुंदर आनंदाचे क्षण अनुभूतीस आणून देते. जीवनाची, सृष्टीची, विश्वाची, चराचरांची खरी ओळख याच तत्वचिंतनातून होते.
या पृथ्वी सह विश्वात जगण्याचा जसा मानवाला अधिकार आहे तसाच तो सृष्टीतील प्राणीमात्रांना आणि वनस्पतीसह पंचमहाभूदादी सर्वांना समत्व पातळीवर आहेच आहे. सहजिवन, आनंदी जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी तत्वे श्री कृष्णा जाधवांनी सहज सुंदर भाषेत अधोरेखीत करत “एक तरी ओवी” मधील लेखांमधून मांडलेली आहेत.
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक श्री मधुमंगेश कर्णिक अध्यक्ष म्हणून लाभले असून मा. डॉ. सदानंद मोरे, संत साहित्याचे अभ्यासक, ६८ व्या अ.भा.सा.सं अध्यक्ष, मराठी भाषा साहीत्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांच्या शुभहस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ संत आदरणीय शांतीब्रम्ह मारुती महाराज कुन्हेकर (बाबा), मा. योगेश देसाई, मा. उर्जित सिंह शितोळे सरकार, मा. पुरुषोत्तम महाराज, ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर (दादा) इत्यादी जेष्ठ मंडळी, अधिकारी मंडळी उपस्थित राहणार आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम पुण्यनगरीत असताना या कार्यक्रमाचे औचित्य साधून आयोजन होत आहे. या सोहळ्याला दैनिक राज्य लोकतंत्र कडून निवासी संपादक गणेश मोकशे, कार्यकारी संपादक डॉ बाळासाहेब पिंगळे, प्रतिनिधी अनुष्का कोंड्रा व प्रतिनिधी विनायक भिसे यांची उपस्थिती आहे.
संत साहित्याच्या “एक तरी ओवी” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर यांच्या कडून करण्यात आले आहे.




