
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि.२१ एप्रिल २०२४ शहरात वास्तव्य करणा-या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या
हजारो कोकणी बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून, मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला.
पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्षेत्रात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने वधू- वर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या कार्यक्रमात शहरातील हजारो मतदारांनी मतदानाची शपथ घेतली.यावेळी नोडल अधिकारी मुकेश कोळप,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे,प्रमोद राणे,परषुराम प्रभू, दिपज्योती सावंत उपस्थित होत्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळपास ६ हजाराहून अधिक कुटुंबे शहरात वास्तव्य करतात, मतदारांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे यामध्ये नवोदीत मतदारांचाही समावेश आहे.
यावेळी सर्वांनी १३ मे रोजी होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. नवोदीत मतदार मनाली पाताडे यांनी नवोदीत इतर मतदारांसह सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.



