आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरशोध इतिहासाचा..सामाजिक

बूद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात दि. ८ मार्चला बौद्ध धर्मीयांचा पूण्यात शांतता मार्च..

प्रतिनिधी पूणे दि. ०४ मार्च २०२५ महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती, पुणे शहर /पुणे जिल्हा यांचे वतीने सोमवार दिनांक ३ मार्च २०२५ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन या ठिकाणी महाबोधी विहार येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यासाठी पुणे शहर व जिल्ह्यातील बौद्ध धर्मीय तसेच परिवर्तनवादी चळवळीतील सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला की शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी दुपारी ठीक ४:००वाजता बौद्ध धर्मीयांचा शांतता मार्च काढण्यात येणार असून या मार्चची सुरुवात बालगंधर्व रंगमंदिर येथून सुरू होऊन सांगता अलका टॉकीज चौक या ठिकाणी होणार आहे या मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने अनुयायांना हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी सन्माननीय भिक्खू संघ उपस्थित होता…
१- भदंत नागघोश महाथेरो, पुणे
२- भदंत डॉक्टर हर्षबोधी महाथेरो, संभाजीनगर
३- भदंत राहुल, पुणे
४- भदंत पस्त्रारखीत, पुणे
५-भन्ते धम्मानंद, पुणे
६- भंते प्रियदर्शी

यांच्यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटना व धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते..
वसंत साळवे, रोहिदास गायकवाड, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अविनाश साळवे, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नागेश भोसले, शैलेंद्र चव्हाण, राहुल डंबाळे, महिपाल वाघमारे, सुनिता वाडेकर, हेमलता भालेराव, सुदीप गायकवाड, सचिन बनसोडे, दिलीप कुसाळे, निलेश आल्हाट, श्याम गायकवाड, सतीश गायकवाड, राजेंद्र कांबळे, सिद्धार्थ नागदेवते, राजरत्न थोरात, नितीन कांबळे, शैलेंद्र मोरे, ॲड. किरण कदम, निलेश गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत साधारण 500 ते 550 कार्यकर्ते उपस्थित होते.
हे आंदोलन संपूर्ण जगभर आणि देशभर का चालू आहे याची माहिती पुढील प्रमाणे:
महाबोधी मुक्ती आंदोलन: बौद्ध धर्मीयांचा धार्मिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष
बिहारमधील बोधगया येथे स्थित महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. येथेच भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे हे संपूर्ण बौद्ध जगतात सर्वात महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. मात्र, दुर्दैवाने या ठिकाणच्या व्यवस्थापनावर बौद्ध धर्मीयांना पूर्ण नियंत्रण नाही, हेच या आंदोलनाचे प्रमुख कारण आहे.

महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा, 1949 – हिंदूंचे वर्चस्व
बिहार सरकारने 1949 मध्ये “महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949” लागू केला, ज्याद्वारे महाबोधी महाविहाराच्या देखरेखीचे आणि व्यवस्थापनाचे काम महाबोधी मंदिर व्यवस्थापन समिती (Bodh Gaya Temple Management Committee – BGTMC) कडे सोपवण्यात आले. या समितीत हिंदूंचे स्पष्ट वर्चस्व आहे.
समितीतील धर्मीयांचे प्रमाण:
एकूण सदस्यसंख्या – 9

हिंदू (ब्राह्मण) सदस्य+ अध्यक्ष – 5 (बहुमत)

बौद्ध सदस्य – 4 (अल्पमत)

महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949, यानुसार महाबोधी विहाराच्या व्यवस्थापन समितीमध्ये 4 हिंदू (महंत/ ब्राह्मण) आणि 4 बौद्ध (भिक्खू) सभासद असावे. तसेच या समितीचा अध्यक्ष “हिंदू”च असावा असाही नियम आहे.
अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट:
या कायद्याच्या नियमानुसार, समितीचा अध्यक्ष हमीने हिंदूच असावा आणि तो जिल्हाधिकारी (District Magistrate) असावा. एखाद्या परिस्थितीत जर बोधगयेचा जिल्हाधिकारी हिंदू नसेल तर शेजारील जिल्ह्याच्या “हिंदू” जिल्हाधिकाऱ्याला समितीचे अध्यक्षपद दिले जाते.
याचा अर्थ बौद्ध धर्मीय (भिक्खू) महाबोधी महाविहाराचे अध्यक्ष होऊ शकत नाहीत.
बौद्ध धर्मीयांवर अन्याय – अन्य धर्मांच्या स्थळांसाठी वेगळे नियम?
एखाद्या धर्मीयांच्या धार्मिक स्थळावर त्याच धर्म बांधवांचा अधिकार असतो आणि असावा, ही गोष्ट सर्वश्रुत आहे.
१) हिंदू मंदिराच्या व्यवस्थापन समितीत फक्त हिंदूच असतात.
२) चर्चच्या व्यवस्थापन समितीत फक्त ख्रिश्चन व्यक्तीच असतात.
३) गुरुद्वाऱ्याच्या व्यवस्थापन समितीत फक्त शीख लोकच असतात.
४) मशिदीच्या व्यवस्थापन समितीत फक्त मुस्लिमच असतात.
मात्र, महाबोधी महाविहार बौद्ध धर्माचे असूनही तेथील व्यवस्थापन समितीत बौद्धांहून जास्त हिंदू (ब्राह्मण)सभासद आहेत! हा बौद्ध धर्मीयांवरील मोठा अन्याय आहे.
बौद्ध धर्मावर होणारे अतिक्रमण:
या व्यवस्थेमुळे महाबोधी महाविहारात हिंदू ( ब्राह्मण) धर्माचे कर्मकांड आणि विधी कायदेशीरपणे केले जातात, जे बौद्ध धर्मात निषेधार्ह आहेत. बौद्ध स्थळावर बौद्ध धर्माचे आचरण व्हायला पाहिजे, पण येथे हिंदू (ब्राह्मण) धर्माचरण घडते.
बरेच हिंदू लोक महाबोधी मंदिराला “शिव मंदिर” म्हणून चुकीची ओळख देत आहेत, पण इतिहास पाहिला तर स्पष्ट होते की हे शिव मंदिर नसून, सम्राट अशोकाने बांधलेले भगवान बुद्धांचे महाविहार आहे.
महाबोधी मुक्ती आंदोलन – बौद्ध धर्मीयांची मागणी
12 फेब्रुवारी 2025 पासून बिहारमध्ये ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ सुरू आहे. या आंदोलनात बौद्ध भिक्खू आणि उपासक महाबोधी महाविहाराच्या संपूर्ण नियंत्रणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे, परंतु त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बौद्ध धर्मीयांच्या प्रमुख मागण्या:
०१) महाबोधी महाविहाराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध धर्मीयांकडे द्यावे.
०२) महाबोधी मंदिर व्यवस्थापन कायदा 1949 मध्ये सुधारणा करावी आणि व्यवस्थापन समितीत फक्त बौद्ध धर्मीय असावेत.
०३) समितीच्या अध्यक्षपदी हिंदू कलेक्टर असण्याची अट रद्द करून, बौद्ध धर्मीयांना अध्यक्ष होण्याचा अधिकार द्यावा.
०४) महाविहाराच्या धार्मिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये कोणत्याही बाह्य धर्मीयांचा हस्तक्षेप थांबवावा.
बौद्ध धर्मीयांसाठी एक महत्त्वाची लढाई!
महाबोधी महाविहार केवळ एक पर्यटन स्थळ किंवा धार्मिक स्थळ नाही, तर ते संपूर्ण बौद्ध समुदायासाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र आहे. त्याच्या संरक्षणासाठी आणि धार्मिक स्वायत्ततेसाठी लढा देणे प्रत्येक बौद्ध अनुयायाचे कर्तव्य आहे. महाबोधी मुक्ती आंदोलनाला पाठिंबा द्या, या आंदोलनाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि बौद्ध धर्माच्या हक्कांसाठी आवाज उठवा! असे अखिल भारतीय बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!