महानगरपालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. ११ जानेवारी २०२४ – भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रखर देशभक्त होते. त्यांची साधी राहणी तसेच शेतकरी आणि सैनिकांबद्दलची आत्मियता आजच्या काळातही अनेकांना प्रेरणा देणारी आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी बालाजी अय्यंगार तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेऊन माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी “जय जवान जय किसान” या क्रांतिकारी घोषणेचा नारा दिला. भारताचे पंतप्रधान पद भूषवत असताना त्यांनी देशाला नवी दिशा देण्याचे काम केले तसेच त्यांनी केंद्रीय परराष्ट्रमंत्री पद देखील भूषविले होते.




