उत्सवपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन संपन्न..

‘पहिल्या दिवसाची सुरुवात महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमाने तर ‘पुण्यश्लोक’ महानाट्यातून सादर झाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जीवनपट..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ मे २०२५ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात करण्यात आली.
प्रबोधन पर्व उद्घाटन कार्यक्रमास माजी नगरसदस्य राजू दुर्गे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर, बंडू मारकड, राजेंद्र गाडेकर, आशा काळे, धनंजय तानले, महावीर काळे, शारदा मुंडे, रेखा दुधभाते, दत्ता शेंडगे, नरेंद्र चऱ्हाटे, बिरू बनमाने, नवनाथ बिडे, निखील पडळकर, महादेव कवितके, अजय पाताडे, शोभा भराडे, राजश्री जायभाये, कविता पाटील, बापू गडदे, यशोधन नायकवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्व:कर्तुत्वाने सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेले लोककल्याणकारी राज्य अनेक वर्षे चालवले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घेत शहरातील नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रबोधन पर्वाच्या सुरवातीला ऑल इन वन निर्मित आणि के. डी. कड प्रस्तुत ‘खेळ पैठणी’ हा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या खेळात सहभागी प्रत्येक महिलेला आकर्षक भेट वस्तू देण्यात आली. तर खेळ पैठणीच्या या भव्य कार्यक्रमात सुनिता काळे यांना प्रथम क्रमांकाची मानाची पैठणी तर आरती पाटील यांना द्वितीय क्रमांकाचे आणि छाया नाईकवाडे यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या कार्यक्रमासाठी अतुल कड, अविनाश होरे, बबन गायकवाड, जालिंदर नलावडे, आरती कांबळे, पुजा सिंधीया यांचा सहभाग होता.
दुपारच्या सत्रात शाहीर यशवंत जाधव यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जीवनावर आधारित शाहिरी सादर केली. त्यानंतर सादर झालेल्या पुण्यश्लोक फाउंडेशन निर्मित धनंजय तानले प्रस्तुत, श्रीकृष्ण परांजपे लिखित व गणेश इनामदार दिग्दर्शित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडवणारे “पुण्यश्लोक ” हे महानाट्य पार पडले. या महानाट्यास महिला व नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म, शाही विवाह सोहळा, युध्दकुशलता, स्वाभिमानी व मुत्सद्दी राज्यकारभार, राष्ट्राप्रती असलेली अस्मिता व देशभक्ती असे विविध प्रसंग या महानाट्यात ६४ कलाकारांच्या समुदायाने अत्यंत प्रभावीपणे मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश भोसले यांनी केले.
या तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये उद्या दूस-या दिवशी आचार्य अत्रे रंगमंदिर येथे उद्या शुक्रवारी दुपारी ३ वाजता महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा, भूपाळी, पिंगळा, वासुदेव, गोंधळी, धनगरी नृत्य, शाहिरी पोवाडे अशा अनेक लोककलेचा “सुवर्ण महाराष्ट्राचा लोकोत्सव” हा कार्यक्रम तसेच सायंकाळी ५ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे यांचे व्याख्यान असे प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत.
या कार्यक्रमास शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!