निगडी अमरधाम स्मशानभूमीत पावसामुळे अंत्यविधीस अडथळा – सामाजिक न्याय विभागाने मेलद्वारे पालिका प्रशासनाकडे लक्ष वेधले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ जूलै २०२५ पिंपरी चिंचवड शहरातील निगडी परिसरातील अमरधाम स्मशानभूमीतील अंत्यविधीची जागा पावसामुळे अक्षरशः अडचणीत आली आहे. कारण, या ठिकाणी जिथे मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार पार पडतात त्या भागावरील छताचे पत्रे तुटलेले, झुकलेले किंवा पडलेले असून पावसाचे पाणी थेट अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पडत आहे. यामुळे अंत्यविधी करताना मृताच्या कुटुंबीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. इतकेच नव्हे तर या ठिकाणी लाईटी लागत आहे, पाणी साचते आहे, आणि हे दृश्य पाहणे अत्यंत वेदनादायक ठरत आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुनिल कांबळे (राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गट) यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकृत ई-मेल आयडीवर हे पत्र पाठवून स्मशानभूमीतील परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. हे पत्र पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त मा. शेखर सिंह साहेब यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
पत्रामध्ये पुढील मागणी केली आहे:
१) निगडी अमरधाम स्मशानभूमीच्या अंत्यविधी स्थळावरील सर्व तुटलेले पत्रे तातडीने बदलावेत.
२) अंत्यसंस्काराच्या वेळी नागरिकांना पावसात उभं राहावं लागू नये, यासाठी योग्य सुविधा उपलब्ध कराव्यात.
३) मानवी भावना, श्रद्धा आणि सार्वजनिक आरोग्याचा आदर राखणारी व्यवस्था त्वरीत उभी करावी.
ही बाब अभिजीत बालाजी जाधव उर्फ निर्मोही यादव यांच्या मार्गदर्शनात पुढे आणण्यात आली असून, नागरिकांच्या वतीने पालिकेचे लक्ष वेधले आहे.
सदर विषयात महापालिका तातडीने कार्यवाही करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली अन्यथा भविष्यात नागरिकांच्या भावना आणि सार्वजनिक हितासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही यानिमित्ताने सुनिल कांबळे यांच्यावतिने देण्यात आला आहे.



