महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजातील धर्मगुरूंवर होणार्या अत्याचारांच्या घटना थांबवा. दोषींवर कठोर कारवाई करा. आणि आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करा- पा. विजय वायदंडे

प्रतिनिधी सांगली दि. १९ ऑगस्ट २०२५ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. ना. अजितदादा पवार हे दि.१६ ऑगस्ट रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता. सांगली जिल्हा सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने पा. विजय वायदंडे उपाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी सांगली शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पा. संजय गेळे (पाटील), पा. प्रसन्न काळे, ब्रदर आशिष सोनवणे, ब्रदर विलास गेळे (पाटील) यांच्या शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. आणि ठोस कारवाई होण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा केली.
अलिकडच्या काळात महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या अनुषंगाने खालील मागण्यांचे निवेदन ना. अजितदादा पवार यांना देण्यात आले.
१) राज्यातील ख्रिस्ती समाजातील धर्मगुरूंवर धर्मांतराचे खोटे आरोप लावून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून अत्याचार करणाऱ्या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या पक्ष संघटनां व त्यांचे कार्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
२) ख्रिस्ती समाजातील धर्मगुरू यांना निर्भय वातावरणात आपले धार्मिक सेवाकार्य करण्यासाठी पुरेसे पोलीस संरक्षण देण्यात यावे.
३) प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापन करण्यात यावी.
४) राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या उपाध्यक्ष पदी ख्रिस्ती समाजातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी.
५) आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी.
वरील मागण्यांचे निवेदन ना. अजितदादा पवार यांना दिले असता. त्यावर त्यांनी उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. तसेच तुम्ही आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करा. त्याला आम्ही पुर्णपणे सहकार्य करू असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
एकूणच सांगली जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे संविधानिक हक्क अधिकार अबाधित राखण्यासाठी तसेच धर्मगुरू व बंधु भगिनींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी पुढील काळातही आपण आम्ही कार्यरत राहणार असल्याचे पा. विजय वायदंडे व त्यांच्या शिष्टमंडळाने म्हटले आहे.



