पालिकेच्या आज पर्यंतच्या भाजपच्या भ्रष्टाचारातून शहरातील प्रत्येक मताला मिळूशकतात ५१ हजार रुपये..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १४ सप्टेंबर २०२५ भ्रष्टाचाराचा विंचू पिंपरी चिंचवडकरांना सतत डंख मारून जातो कोठे ही कधी ही बोभाटा होत नाही झालाच तर त्यावर कधीही उपचार होत नाही हे लक्षात असायला हवे पण सध्या पिंपरी चिंचवड शहरात देवाभाऊ लक्ष घाणार असल्याचे पोस्टर्स लागले.
गेली ५ वर्ष शहरामध्ये भाजप आणि ३ वर्षे प्रशासन कारभार करत आहे.
मुख्यमंत्र्यांचे लागलेले पोस्टर्स आणि आठ वर्षाचा कारभार यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव पाटील यांनी थेट देवा भाऊंना म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समाज माध्यमातून पत्र लिहून पाठवले.
पाटील पत्रात असे म्हणतात की, गेले आठ वर्ष या शहराकडे कोणत्याही नेत्याचे लक्ष नव्हते. आता तुमचे पोस्टर्स पाहून तुम्ही लक्ष देणार असं वाटतंय. तुम्ही इकडे लक्ष दिले तर खालील विषय तुम्हाला माहित असावेत म्हणून देवाभाऊ तुम्हाला हे पत्र. आयुक्तांना सांगून सांगून आम्ही तर दमलो कि विविध विषयांच्या श्वेतपत्रिका काढा पण नाहीच. असो…
इथे रोज ४५ जणांना पिसाळलेले कुत्रे चावतात कारण कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये भ्रष्टाचार झालेला असतो. आणि म्हणून नागरिकांना शहरात घाबरून राहावे लागते. पण कारवाई शून्य.
इथे ३०० कोटीची पवना पाईपलाईन १५०० कोटींवर जाते, इथे जलपर्णीचे शेकडो कोटी दरवर्षी ठराविक खिशात जातात, इथे फक्त १.२५ किलोमीटर साठी ८२ कोटीचे टेंडर काढले जाते, इथे १५०० कोटीचा टीडीआर घोटाळा होतो पण सगळे अळीमिळी गुपचळी, इथे जनतेला नको असतानाही लादलेल्या हरित सेतूसाठी हरितबॉण्ड नाही भीकबॉण्ड काढला जातो आणि २०० कोटी उधळले जातात, इथे नदीसुधार खाली २००० कोटीचे टेंडर काढून निसर्गाचा, नदीचा गळा आवळून गळा सुशोभित केला जातो पण गळ्यातले पाणी गटारापेक्षा खालच्या दर्जाचे असते, इथे दिवसाढवळ्या झाडे तोडून लाकूडतोड्या ते क्लासवन अधिकारी करोडपती होतात, इथे लाडक्या बहिणींचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे हाल होतात कारण दर दिवसाआड तीन-चार तास करंगळीएवढे पाणी येते, इथून ३७ आयटी कंपन्या आपला बाडबिस्तरा घेऊन जातात, इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकातसुद्धा घोटाळा होतो, इथे गेली १३ वर्षे पालिकेच्या खेळाडूंना दत्तक खेळाडू योजनेचे पैसे मिळत नाहीत. इथे एक तासाच्या पावसात स्मार्ट सिटी गुडघाभर पाण्याखाली बकाल सिटी होवून जाते.
गेल्या आठ वर्षात लोकांनी अभिमानाने सांगण्यासारखे किमान आठ प्रोजेक्टसुद्धा या शहरात उभे राहिले नाहीत. पालिकेचे दरवर्षीचे ६००० कोटीचे बजेट आहे. गेली आठ ८ वर्ष X ६००० कोटी = ४८,००० कोटी गेले कुठे ? शहर भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून पिंपरी चिंचवड पालिका जिंकण्यासाठी, मतदारांना वाटण्यासाठी ४८००० पैकी १०००० कोटी नक्कीच बाजूला ठेवले असतीलच.
यावेळेसचे १७.५ लक्ष मतदार x ५१,००० = ८९२५ , ००००००० रुपये. म्हणजे यावेळेस भाजप एका मताला ५१ हजार रुपये नक्की देणार , इतका भ्रष्ट्राचार इथे झाला आहे.
महाराजांसोबतचे देवाभाऊचे फोटो पहिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जसे आपल्याच दोषी सहकाऱ्यांना शिक्षा दिल्या तशा तुम्हीही शिक्षा द्याल ही अपेक्षा अजिबात ठेवणार नाही. देवाभाऊ, आपण या शहराच्या महानगरपालिकेत गेल्या आठ वर्षात घडलेल्या अनियमिततेची (भष्ट्राचाराची ) कोणतीही चौकशी न करता, सगळ्यांना क्लीनचीट देऊन येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदारांना एका मताचे ५१ हजार रुपये मिळू द्यावेत ही नम्र विनंती.
देवाभाऊ करा रिसर्च, तोपर्यंत होऊदे खर्च असेही पाटील म्हणतात.
थोडक्यात पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरू भ्रष्टाचाराचा पाढा वाचूनच दाखवला आहे.



