महाराष्ट्रमूंबईवाहतूक कोंडीविशेषशहरसामाजिक

खा. संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न..

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. १० जून २०२६ भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेली बेस्ट बस चौकी आता पर्यायी जागेवर हलविण्यात येत असून तिच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या निर्णयामुळे भांडुप स्टेशन परिसर अधिक प्रशस्त, सुरक्षित व नागरिकांसाठी सुलभ होणार आहे.
भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील बेस्ट बस चौकीमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. याशिवाय या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासन, पालिका व बेस्ट अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून चौकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करत त्यांनी प्रशासनाला या प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी भाग पाडले. त्यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे.
नवीन चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेली विद्यमान बेस्ट चौकी हटविण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील अडथळे दूर होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेली पोलीस बीट चौकीदेखील लवकरच पर्यायी जागेवर हलविण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण स्टेशन परिसर मोकळा होऊन पादचारी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेवक सुरेशजी शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण , विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापकीय प्रमुख अर्जुन मांजरेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्टेशन परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले असून, त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे भांडुपकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठा अडथळा दूर होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!