आर.पी.आय. शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार- सुरेंद्र थोरात.
(प्रतिनीधी-अजय विघे)-
झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार.
महागाईचा आगडोंब उसळला आहे, परंतु श्रमजीवी शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव नाही. अतिवृष्टी, अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले. अशा अस्मानी व सुलतानी संकटात शेतकरी भरडला आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आरपीआय (आठवले गट) रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.
सुरेंद्र थोरात म्हणाले की, कांदा, कापूस, सोयाबिन, गहू, ऊस पिकांना किफायतशीर भाव मिळावा. दोन लाखांच्यावर रखडलेली कर्जमाफी, शेतीची वीजबिल माफी, अतिवृष्टीचा पीकविमा व नुकसान भरपाई आदी मागण्यांसाठी आरपीआय चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत.
शेतमालाला मातीमोल भाव आहे. अतिवृष्टीमुळे उसाचे उत्पादन घटले, त्यात साखर कारखान्यांची काटामारी वाढली आहे. उसाला जिल्ह्या बाहेर साखर कारखाने तीन हजारांवर प्रतिटन भाव देतात. जिल्ह्यातील कारखाने अवघे २४०० रुपये प्रतिटन भाव देऊन शेतकऱ्यांची लुटमार सुरू आहे.
ऐन गव्हाच्या हंगामात केंद्र सरकारने गहू आयात केला. २५ लाख टन गहू खुल्या बाजारात विक्रीसाठी काढला. त्यामुळे गव्हाचे दर कोसळले, पामतेल आयात करून सोयाबिनचे दर पाडले, वायदे बाजार व निर्यात बंद करून कापसाचे दर पाडले, तीच अवस्था कांद्याची आहे. शेतकऱ्यांचे कंबरडे पुरते मोडले आहे.
राज्याच्या अर्थ संकल्पात शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विम्याचे गाजर उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले. परंतु शेत मालाला रास्त भाव मिळण्यासाठी करावयाच्या उपाय योजनेवर चकार शब्द काढला नाही. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडणार आहे. असे आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सांगितले.



