भारतीय भटके-विमुक्त विकास संशोधन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यास शरद पवारांची उपस्थिती..

प्रतिनिधी-जकातवाडी भारतीय भटके-विमुक्त विकास संशोधन संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या फुले-आंबेडकर साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यास आज जकातवाडी येथे उपस्थित होतो. मागील अनेक वर्षे या संस्थेशी माझा संबंध येत आहे. ज्या वर्गाला आधार नाही अशा वर्गातील मुलामुलींना एकसंध करणे, त्यांना शिक्षित करणे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हे ध्येय स्वीकारून लक्ष्मण माने गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत.
या संस्थेची सुरुवात स्व. यशवंतराव चव्हाण आणि लक्ष्मण माने यांनी केली. संस्था स्थापन झाली आणि दुर्दैवाने चव्हाण साहेब आपल्यातून निघून गेले. त्यामुळे ही जबाबदारी मी घ्यावी अशी सूचना माने यांच्याकडून आली. मागील चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ मी या संस्थेचा अध्यक्ष आहे. पण खऱ्या अर्थाने काम करण्याची, धोरण राबवण्याची, प्रश्न सोडवण्याची सगळी जबाबदारी लक्ष्मण माने आणि त्यांचे सहकारी घेतात. आम्ही ९ तारखेला इथे येतो, तसेच संकटकाळात त्यांच्यासोबत राहतो पण संस्थेच्या कामाचे संपूर्ण श्रेय लक्ष्मण माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले पाहिजे. हे काम करताना त्यांच्या तीव्र भावनाही ऐकाव्या लागतात. त्यामागची स्थिती काय याचा गांभीर्याने विचार केला तर ज्याला दुखते तोच त्याबद्दलची प्रतिक्रिया देऊ शकतो, हे लक्षात येते.
आज याठिकाणी अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींचा सन्मान झाला याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार फुले-आंबेडकर पुरस्कार आहे. ही नावे आणि जे लोक या क्षेत्रात काम करतात त्यांचे कार्य याचा एकप्रकारे संबंध आहे. फुले-आंबेडकर पुरस्कार याचा अर्थ समतेचा पुरस्कार, अभिव्यक्तीचा पुरस्कार हे सूत्र घेऊन लक्ष्मणराव आणि त्यांचे सहकारी काम करत आहेत.
ज्यांचा सन्मान याठिकाणी केला त्या तीनही व्यक्ती या आदर्शाच्या संदर्भात काही ना काही योगदान दिलेल्या आहेत. त्यामुळे अशा व्यक्तींचा याठिकाणी गौरव होत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो.




