महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पंडिता रमाबाई मुक्ती मिशनवर निराधार आरोप करणाऱ्यांचा ख्रिस्ती समाज तर्फे निषेध

प्रतिनिधी पुणे दि. २८ फेब्रूवारी २०२४ या देशाच्या उभारणीत, राष्ट्रीय उत्पन्नात आणि विकासात महत्वाचे योगदान ख्रिस्ती समाज देत आला आणि देत आहे. कोणत्याही प्रकारचे उपद्रव मूल्य नसणार्या शांत आणि सुस्वभावी ख्रिस्ती समाजाला जाणिवपूर्वक अशांत आणि अस्थिर करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांत वाढले आहे. यासाठी धर्मगुरू, प्रार्थनास्थळे यांवर हल्ले; सेविकांवर अत्याचार, भक्तांना मारहाण, यासोबतच ख्रिस्ती संस्थांच्या मालमत्ता हडप करणे यासारख्या अक्षम्य घटना घडत आहेत. धर्मांतराचा आजपर्यंत एकही गुन्हा कायद्याने सिद्ध झालेला नाही. असे असताना, मागील दोन महिन्यांपासून केडगाव (पुणे) येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशनच्या कारभारावर काही राजकीय पुढारी बिनबुडाचे आरोप करीत आहे. मुक्ती मिशनमध्ये इतर धर्मीय मुलींचे धर्म परिवर्तन केले जाते, असा हेतुपरस्पर आरोप काही राजकीय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. या संदर्भात काही व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांवर फिरत होत्या. तथापि हे सर्व बिनबुडाचे आरोप केवळ ख्रिस्ती समाजाला विनाकारण बदनाम करण्यासाठीच षडयंत्र रचून काही राजकीय पुढारी करीत आहेत. त्यांच्या अशा आरोपाला तोंड देण्यास आणि मुक्ती मिशनला पाठिंबा देण्यास पुण्यातील “पुणे ख्रिश्चन कौन्सिल” या संघटनेतील बिशप, पास्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनला भेट दिली. तेथील प्रशासन आणि व्यवस्थापन कमिटीशी चर्चा करून सर्व गोष्टींचा आढावा घेतला. काही विद्यार्थी, पाळक, अंध भगिनी आणि पर्यवेक्षक यांच्याशी विस्तृत चर्चा केली असता, सर्व आरोप खोटे असून विनाकारण ख्रिस्ती धर्माबद्दल तेढ व द्वेष निर्माण करण्याचे मोठे षडयंत्र या मागे आहे असे निदर्शनास आले. सदर ख्रिस्ती संस्था मागील १३५ वर्षांपासून अनेक गोरगरीब, निरश्रित, कुष्ठरोगी, अंध, विधवा आणि अनाथ मुलांचे संगोपन करीत आहे. त्यांना उच्च शिक्षित करून भावी जीवन सुसह्य करीत आहे. पंडिता रमाबाई यांचे अनमोल कार्य, अगाध ज्ञान आणि दूरदृष्टी पाहूनच सरकारने त्यांना पंडिता, सरस्वती आणि १९१९ साली “कैसर ए हिंद” पदवी बहाल केली. तसेच भारत सरकारने १९८९ साली पंडिता रमाबाई यांच्या स्मरणार्थ पोस्ट तिकिटाचे अनावरण करून त्यांचा सन्मान केला. बाल विवाह आणि सती प्रथा बंद करण्यास पंडिता रमाबाई यांचा सिंहाचा वाटा आहे. अशा नामंकित शैक्षणिक संस्था व अनाथ आश्रमावर धर्मांतराचे आरोप वारंवार केले जात आहेत, तसेच बळजबरीने धर्मांतर केले जाते व बाप्तीस्मा दिला जातो, चर्च मधील प्रभू भोजन पवित्र विधीला वाईन व पाव जबरदस्तीने दिला जातो, अशा प्रकारचे गंभीर आरोप राजकीय पक्षाचे काही लोकप्रतिनिधी करीत आहेत. निश्चितपणे ही बाब निंदनीय आणि दुर्दैवी आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा.राजन नायर यांनी केले. चर्चला मोठ्या प्रमाणात पैसे प्राप्त होतात आणि लोकांचे धर्मांतर केले जाते, त्यांना पैसे, नोकरी आणि घरदार दिले जाते असा अपप्रचार काही संघटना वारंवार करत आहेत, पण या मध्ये काहीही तथ्य नाही असे पोलिस तपासात अनेकदा निष्पन्न झाले आहे. तरीही राजकीय पोळी भाजण्यास काही राजकीय पुढारी पैशांचा गैरवापर करुन खोटे पुरावे सादर करीत आहेत. अशा लोकांवर योग्य ती कारवाई करावी, त्यांच्यावर अंकुश ठेऊन राजकारण आणि समाजकारणातून बहिष्कृत करावे अशी मागणी पुणे ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष रेव्ह. डॉ. सॉलोमन भंडारी आणि प्रवक्ते रेव्ह. राजेंद्र कदम यांनी केली. ते पुढे म्हणाले, जर पैसे देऊन अथवा घर आणि नोकरीचे आमिष दाखवून धर्मांतर होत असते, तर आज भारत देशात गरिबी आणि बेरोजगारी राहिली नसती.
ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थना मंदिरात धर्मगुरू आणि चर्च मधील लोकांवर समाजकंटकांचे हल्ले वाढत्या प्रमाणात वाढत असून झुंडशाही व दडपशाही वाढली आहे, ती त्वरित थांबवावी, तसेच त्यासाठी कडक कायदे निर्माण करून प्रत्येक चर्चला संरक्षण द्यावे, या मागणीसाठी लवकरच निवेदन देण्यात येणार आहे. ख्रिस्ती समाजाची बदनामी किंवा अन्याय अत्याचार बाबत योग्य दखल न घेतल्यास आगामी काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ख्रिस्ती बांधवांनी दिला आहे. मागील आठवड्यात बारामती लोकसभेच्या लोकप्रिय खासदार व संसदरत्न मा. सुप्रियाताई सुळे यांनी मुक्ती मिशनला भेट देऊन पाहणी करून चर्चा केली, त्यांनी देखील मिशनला पाठिंबा देऊन सहकार्य केले, या भेटीस सि. स्मिता नॉर्टन यांनी पुढाकार घेतला.
पुणे ख्रिश्चन कौन्सिल द्वारे रेव्ह. सॉलोमन भंडारी, मा.राजन नायर, कायदेशीर सल्लागार ॲड. शशिकांत संसारे, रेव्ह. विल्सन पाटोळे, रेव्ह. राजेंद्र कदम, बिशप डॉ. अनिश विजागत, रेव्ह. दिगंबर शिंदे, रेव्ह. सुनंदा त्रिभुवन, पा. अलीशा कोनेसागर, पा. गौरव थापर, पा. गीता भोसले, रेव्ह. अविनाश वाघमारे, पा. बन्यामीन काळे, सि. स्मिता नॉर्टन, ब्र. प्रवीण वाघमारे, ब्र. मनोज मिसाळ आणि ब्र. डेव्हिड काळे यांनी पंडिता रमाबाई मुक्ती मिशनला भेट देऊन दिलासा आणि पाठिंबा दिला, या समयी मुक्ती मिशनचे डायरेक्टर सि. लॉरेन फ्रान्सिस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ब्र. अनिल फ्रान्सिस यांनी सर्वांचे आभार मानले, मिशनला अशा समयी भेटून ठामपणे सोबत उभे राहिल्या बद्दल समस्त ख्रिस्ती समाज आणि पुणे ख्रिश्चन कौन्सिल बाबत कृतज्ञता व्यक्त केली गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!