दहिगांव रस्त्यावर लुटमार करून गंभीर जख्मी करणाऱ्या गुंड टोळीवर गुन्हे नोंदवून फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करा अन्यथा जख्मी मनोज घनवट करणार पोलीस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषण..

प्रतिनिधी अविनाश देशमुख शेवगांव दि. २९ जुलै २०२५ या बाबत सविस्तर वृत्त असे की रस्त्यावर लुटमार करून हाणमार करणाऱ्या गुन्हेगारी पवृत्तीच्या टोळीवर योग्य ती फौजदारी स्वरूपाची कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवा अन्यथा शेवगाव पोलीस ठाण्यासमोर प्राणांतिक उपोषण करणार असल्याचे जख्मी मनोज मोहन घनवट रा. भावी निमगाव ता.शेवगाव जि. अहिल्यानगर यांनी एका निवेदनाद्वारे शेवगाव पोलीस निरीक्षकांना केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गुरवार दि.१७ जुलै २०२५ रोजी रात्रीचे ०९.३० वा मी दहीगाव येथे असणाऱ्या जायकवाडी जलाशया वरील पाईपलाईनचा पाईप बसवण्यासाठी व मोटार चालू करण्यासाठी जात होतो. रस्त्याने
जात असतांना दहीगाव कॉलनी येथे माझी मोटरसायकलची चैन तुटली होती. त्याच दरम्यान अचानक मला पाच-सहा लोकांच्या गुंड प्रवृत्तीच्या टोळीने घेरले. त्यापैकी काहींनी मला मारहाण करायला सुरुवात केली. एकाने माझा मोबाईल हिसकावून घेतला, तर दुसऱ्याने माझ्या पॅन्टच्या खिशात हात घालून दमदाटी व मारहाण करत खिशातील १८,५००/- अक्षरी रक्कम अठरा हजार पाचशे रुपये काढून घेतले. त्यांच्या हातामध्ये फायटर व लोखंडी रॉड होता.
त्यांच्यापैकी काहींनी मला पायाला धरून ओढत नेहून शेजारी असलेल्या इरिगेशन कॉलनीच्या गटारात
टाकले. या गुंडांच्या टोळीपैकी श्रीराम उर्फ भाऊ भेंडेकर, रोहन बाळासाहेब मोरे यांना मी ओळखले. परंतु बाकीचे लूटमार करणारी माणसे मला ओळखता आले नाहीत. त्यावेळी रस्त्याने जात असणाऱ्या ओंकार चव्हाण यांनी या टोळीला हटकल्याने हे लोक तिथून निघून गेले. या हाणामारीत माझ्या छातीला व बरगड्याला मोठी जखम झाली आहे. यामध्ये फ्रॅक्चर झाले आहे व डोक्याला मार लागलेला आहे. याबाबत मी दि. २४ जुलै २०२५ रोजी आपल्या पोलीस विभागाकडे तक्रार देखील दिलेली आहे. ही रस्ते लुटणारी पाच ते दहा लोकांची टोळी आहे. या टोळीने विविध भागात अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले आहेत. या टोळीच्या एकास सोनई ता. नेवासा येथील
पोलिसांनी अटक केलेली आहे. वर्तमानपत्रात त्याबद्दल बातमी प्रसिद्ध झालेली आहे. या टोळीची दहिगाव परिसरातील सर्व गावांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. या टोळीचा प्रमुख श्रीराम उर्फ भाऊ भेंडेकर हा असून याने मी फिर्याद दिली म्हणून माझे घरी
कोयता घेऊन आला व माझे वडील मोहन रामदास घनवट यांना दम देत माझी बदनामी करू नका अन्यथा दहिगावला जाणे येणे बंद करून जीवे मारील अशी धमकी दिली. या टोळीच्या दहशतीमुळे माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आहे. या टोळीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी केली अन्यथा आपण ५ ऑगस्ट रोजी शेवगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
ताजा कलम
शेवगांव शहरासह तालुक्यात अचानक गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा व त्यांना आशीर्वाद असणाऱ्या गावपुढाऱ्यांचा उच्छाद वाढला आहे. शेवगांवचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आणि त्यांचे सहकारी यांना आवर घालणार का आणि काहींना तर तडीपार करण्याची गरज आहे त्यांच्या मुसक्या पोलीस प्रशासन आवळणार का ??? असा प्रश्न सर्वसामन्य शेवगांवकर विचारत आहेत.



