दलित समाजातील सरपंच मीनाक्षी सकट यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करून कडक कारवाई करा:- युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २३ ऑगस्ट २०२५ दलित समाजातील सरपंच मिनाक्षी सकट यांच्या अंगावर पेट्रोल टाकुन जाळन्याचा प्रयत्न करणाऱ्याना ताबडतोब अटक करुन कारवाई करा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश सचिव सुरज आण्णा कांबळे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डोखोरे, मावळ लोकसभा अध्यक्ष कृष्णा दादा साबळे व उपनेत्या उषामाई कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना इमेल द्वारे दिलेल्या निवेदनात केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सुरोडी ग्रामपंचायत, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथील विद्यमान सरपंच मीनाक्षी रामदास सकट यांना गावातील जातीवादी गुंडांनी दिनांक १७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्यावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात मीनाक्षी सकट व त्यांचा लहान मुलगा गंभीररित्या जखमी झाले असुन त्यांची गाडी ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे. गेल्या चार वर्षापासून मीनाक्षी सकट या सरपंच झाल्यापासून गावातील जातीयवादी गावगुंड संदीप वागस्कर, विलास वागस्कर, शरद लाटे हे त्यांना नेहमीच त्रास देण्याचे काम करत असून एक दलित समाजाची महिला गावची सरपंच हे त्यांना सहन होत नव्हतं त्यामुळे घडलेली घटना ही नियोजित पणे कट आखून मीनाक्षी सकट यांना जिवंत मारण्याच्या उद्देशाने घडवण्यात आली आहे.
ही घटना वरील नमूद लोकांनी घडवलेले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र अद्याप पर्यंत त्यांना अटक झालेली नाही. तरी या सर्व घटनेचा आम्ही जाहीरपणे निषेध करत असून सदर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही करण्यात यावी व मीनाक्षी सकट यांना शासनाने संरक्षण द्यावे ही मागणी निवेदनात शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे.



