ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

प्रतिनिधी मुंबई दि. ०४ एप्रिल २०२५ ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.
प्रकृती अस्वास्थामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मनोज कुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीत ‘भरत कुमार’ म्हणून ओळखलं जाते. अभिनेते मनोज कुमार यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांमुळे त्यांना एक वेगळी ओळखही मिळाली. आपल्या संवेदनशील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणाऱ्या या अभिनेत्याने अभिनयासोबतही इतरही बऱ्याच क्षेत्रांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीसह संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
मनोज कुमार यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. मनोज कुमार यांचा राजा खोसला यांचा १९६४ मधला मिस्ट्री थ्रिलर असलेला ‘वो कौन थी?’ सुपरहिट ठरला. मनोज कुमार यांचे पूरब औऱ पश्चिम, शोर, हरियाली और रास्ता, वह कौन थी, गुमनाम, शहीद, पत्थर के सनम, सावन की घटा, क्रांति हे सिनेमे अत्यंत सुपरहिट ठरले. शहीद सिनेमातील त्यांच्या शहीद भगतसिंहांच्या भूमिकेचे त्यावेळीचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते.