अभिवादनउत्सवदेश-विदेशपिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी उजळला ज्ञानोत्सव..

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थांनी सोशल मिडीयाद्वारे हजारो मित्रांना व्हाट्सअपद्वारे दिला वाचनाचा संदेश…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑक्टोबर २०२५ ज्ञान, विज्ञान आणि प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारे थोर शास्तज्ञ, भारतरत्न,माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला.
     महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील, सुप्रसिद्ध कवी अशोक गायकवाड, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, शिक्षक जीवन ढेकळे, योगिता कोथावले, उज्ज्वला साटकर, शर्मिला काराबळे, रविंद्र ओव्हाळ, विशाल रेंगडे, सीमा जाधव, निलेश लांडगे यांच्यासह विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
     विद्यार्थी, नागरिक यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि डिजिटल युगातही पुस्तकप्रेम वृद्धिंगत व्हावे, या हेतूने ‘कविसंमेलन’, ‘सोशल मीडियाद्वारे वाचनास प्रोत्साहन देणारे संदेश’, ‘मराठी वाचन कट्टा – डिजिटल वाचनाची नवी दिशा’, ‘मराठी साहित्याचे डिजिटल प्रसारण’ तसेच ‘विकिपीडियावर मराठी लेखन वाढविण्यासाठी कार्यशाळा’ असे विविध उपक्रम यानिमित्ताने पार पडले,आलेल्या मान्यवरांचे संत गाडगेबाबा यांचे जीवनावर आधारित पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
     कवी अशोक गायकवाड यांनी सादर केलेल्या ‘परी सारखी दिसायची तू…’, ‘कळे ना कसा हा जगावेगळा मी…’ अशा विविध भावस्पर्शी कविता उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे मार्गदर्शन, कविता तसेच गझल सादरीकरणाने वातावरणात रसिकतेचा आणि साहित्यप्रेमाचा सुरेल संगम घडून आला. वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, भारत हा महापुरुषांची खाण आहे. प्रत्येक महापुरुष हा वाचनामुळे घडला आहे. भारतातील वाचन संस्कृती, गायन संस्कृती, लेखन संस्कृतीचे विदेशात देखील अनुकरण केले जाते. प्रत्येकाने साहित्यवाचनास प्राधान्य देणे गरजेचे आहे. वाचनामुळे आपला दृष्टिकोन व्यापक होत असतो, असेही त्यांनी सांगितले. तसेच यावेळी त्यांनी कविता आणि गझल या काव्यप्रकाराची सविस्तर माहिती दिली. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ या गाण्याचे सादरीकरणदेखील त्यांनी केले.
     किरण गायकवाड यांनी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनातील विविध उदाहरणांचे दाखले देताना सांगितले की, वाचन म्हणजे केवळ पुस्तकांचे वाचन करणे नव्हे, तर आपल्या आजूबाजूला असणारी माणसेदेखील वाचता आली पाहिजेत. वाचनाची जिज्ञासा ठेवा. स्वतःच्या सामर्थ्याच्या, जिद्दीच्या आणि बुद्धीच्या बळावर यश मिळवण्यासाठी वाचन दिनासारखे उपक्रम उपयोगी ठरतात. वाचनामधून प्रेरणा निर्माण व्हावी, या हेतून आजच्या दिवसाचे आयोजन केले आहे. महापालिका वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये विचारांची देवाणघेवाण वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. वाचनाची प्रेरणा हीच खरी प्रगतीची बीजे आहेत. एखाद्या व्यक्तीला समजून घेण्याची भावना जागृत होण्यासाठी वाचन महत्त्वपूर्ण ठरते, असेही ते म्हणाले.
      ‘प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी नियमित वाचन करणे गरजेचे आहे. वाचन ही केवळ सवय नसून ती व्यक्तिमत्त्व घडविण्याची दिशा आहे. आजच्या डिजिटल युगात माहितीचा अमर्याद साठा उपलब्ध आहे, तथापि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी वाचनासारखा दूसरा प्रभावी मार्ग नाही. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ‘स्वप्न पाहा आणि त्यांना साकार करा’ हा संदेश दिला. त्या स्वप्नपूर्तीसाठी वाचन हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येकाने रोज काही मिनिटे पुस्तकांशी संवाद साधण्याची सवय लावली, तर समाजात विचारशीलता आणि प्रगल्भता वाढेल असे मत प्रफुल्ल पुराणिक यांनी व्यक्त केले त्याचबरोबर त्यांनी भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल सविस्तर माहिती ही दिली.
     यावेळी उज्ज्वला साटकर, जीवन ढेकळे, योगिता कोथावले यांनी विविध कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य शशिकांत पाटील यांनी वाचनाचे महत्त्व, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांची प्रेरणा आणि ज्ञानप्रकाशाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला. सूत्रसंचालन निलेश लांडगे यांनी केले.
जयंती निमित्त उपस्थितांनी घेतली स्वच्छतेची शपथ
“आम्ही अशी प्रतिज्ञा करतो की, भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे वेळ देऊ. आम्ही भारतभूमीच्या स्वच्छतेसाठी आठवड्यातून दोन तास, याप्रमाणे वर्षातील १०० तास उत्स्फूर्तपणे देऊ. आम्ही स्वतः उघड्यावर कचरा टाकणार नाही व इतरांना टाकू देणार नाही. आम्ही आमचा परिवार, आमच्या परिसरातील भाग, आमचे शहर आणि आमच्या कामाचे ठिकाण स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः प्रयत्नशील राहू व इतरांनाही स्वच्छतेसाठी प्रेरित करू. आज आम्ही घेत असलेली ही प्रतिज्ञा अजून १० नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना स्वच्छतेबाबत प्रोत्साहित करू. ते देखील भारतमातेच्या स्वच्छतेसाठी वर्षातील आपले १०० तास देतील.आम्हाला पूर्ण विश्वास आहे की स्वच्छतेसाठी आम्ही उचललेले प्रत्येक पाऊल हे भारतमातेचे रुप अधिक स्वच्छ ठेवण्यास हातभार लावेल,” अशी स्वच्छतेची शपथ उपस्थितांनी घेतली. प्रफुल्ल पुराणिक यांनी शपथेचे वाचन केले.
परीक्षा केंद्रे व ग्रंथालयांमध्ये विविध उपक्रम
माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत सर्व स्पर्धा परीक्षा केंद्रे व सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. विविध केंद्रांवर विद्यार्थ्यांसाठी वाचन सत्र, पुस्तक प्रदर्शन तसेच प्रेरणादायी साहित्याचे वाचन या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद लाभला.  
     माजी राष्ट्रपती,भारतरत्न डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना ‘पद्मभूषण’ ‘पद्मविभूषण’ आणि देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’, ‘व्हॉन ब्राउन पुरस्कार’, ‘रामानुजन पुरस्कार’, ‘किंग चार्ल्स II पदक’ आदी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी गौरविण्यात आले आहे. जगभरातील ४० हून अधिक विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली.
डॉ. कलाम हे एक उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी तरुणांना प्रेरणा देणारी अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी अग्निपंख, इग्नायटेड माइंड्स, इंडिया २०२०, माय जर्नी, मिशन इंडिया, इन्स्पायरिंग थॉट्स आणि ट्रान्सेंडन्स  ही विशेष उल्लेखनीय पुस्तके आहेत त्यांच्या लेखनातून देशभक्ती, विज्ञाननिष्ठा आणि आत्मविश्वासाचा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!