
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ एप्रिल २०२४ लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरु आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवार घोषित केले गेली आहे. तर दुसरीकडे आंबेडकरी चवळीतील सक्रिय कार्यकर्ते मनोज गरबडे हे देखील मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे सोबत आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखिल भरला आहे. गरबडेंच्या उमेदवारीमुळे मावळ लोकसभेत ट्विस्ट निर्माण झाला असल्याचे दिसून येत आहे. आता गरबडे यांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार, याचे गणित मांडले जात आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मनोज गरबडे यांनी म्हटले आहे की, मावळ लोकसभा मतदारसंघ कायमच विकासापासून वंचित राहिला आहे. येथील स्थानिक भूमीपुत्रांच्या समस्या जाणून त्यासाठी लढणारा उमेदवार असावा अशी कायम येथील स्थानिकांची अपेक्षा राहिली आहे. राजकीय पक्ष याकडे गांभिर्याने लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही मावळ लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मावळ परिसराचा विकास व्हायला हवा होता. मतदारसंघात एमआयडीसीचा औद्योगिक पट्टा मोठ्या प्रमाणात असून त्यात कष्टकरी कामगार वर्गाचे अनेक महत्त्वपूर्ण विषय आहेत. कामगारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यासोबतच शेतकरी व आदिवासी बांधवांच्या देखील अनेक समस्या आहेत. पिंपरी चिंचवड, मावळ, उरण,कर्जत व पनवेल भागातील निसर्गसंपन्न भाग, गड, किल्ले, लेण्यांचा विकास करून पर्यटनाला चालना दिली गेली नाही. पाणी, रस्ते, वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. पवना आणि इंद्रायणी नदी स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले गेले आहे. सत्ताधाऱ्यांना महागाई व बेरोजगारी कमी करता आलेली नाही. या मतदारसंघात कोणताही मोठा विकास प्रकल्प राबविण्यात आलेला नाही. याउलट या ठिकाणी मंजूर झालेले मोठे प्रकल्प बाहेरील राज्यात पळविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. याच मुद्यांवर मी काम करणार असल्याचंही गरबडे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोण आहेत मनोज गरबडे?
डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली होती. त्यानंतर हा तरुण अधिक चर्चेत आला होता. शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेचा हा तरुण पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सामाजिक आंदोलने, समाजोपयोगी कार्यक्रम सक्रिय असतो. तसेच तो शैक्षणिक क्षेत्रात व युवकांना उद्योजकतेचे धडे देण्यात त्याची आग्रही भूमिका राहिलेली आहे. सोशल माध्यमातून ही वेळोवेळी स्वतःच्या भूमिका मांडत असतो. तसेच मनोज गरबडे यांना संपूर्ण महाराष्ट्रभरात मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.



